तीन कलाकार, प्रत्येकाची आपली स्वतंत्र गोष्ट आणि त्यांची सांगड हे आव्हान यशस्वी पणे पेलले आहे 'तिसरे बादशाह हम' ह्या नाटकाने. चारू ही बँकेत नोकरी करत असणारी तरुणी आणि उर्मी ही मनोरंजन विश्वात आपले स्थान पक्के करण्यासाठी खटपट करणारी तरुणी ह्या रूम-मेट्स आहेत. आपल्या दैनंदिन खर्चाचा आणि घराच्या भाड्याचा प्रश्न सोडवताना त्यात तिसऱ्या रूम-मेट ची म्हणजेच 'समर' अर्थात तिसऱ्या बादशाह ची एन्ट्री होते. चारू आणि उर्मी ह्या दोघींच्या आयुष्यात होत असणाऱ्या अडचणींमधून समर त्यांना सहज बाहेर काढतो आणि ह्यातच दोघींनाही 'समर' बद्दल आकर्षण वाटू लागते. पण ह्या मध्ये 'समर' चा काही वेगळाच हेतू तर नाही ना ? हे जाणून घेण्यासाठी हे नाटक बघावेच लागेल. कलाकारांच्या कामाविषयी सांगायचे झाल्यास, खुलता कळी खुलेना मधली अभिज्ञा आणि मयुरी ची chemistry ह्या नाटकात अधिकच खुलून दिसते. सुनील बर्वे चा स्टेज अँपिअरन्स तर लाजवाब !! त्यातच त्याने सादर केलेली ऑन स्टेज गाणी म्हणजे दुग्ध शर्करा योगच. असे हे पूर्ण मनोरंजक आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप काही सांगून जाणारे नाटक आहे.
पती गेले ग काठेवाडी काल ठाण्यात पती गेले ग काठेवाडी हे नाटक बघितले. नाटक जुन्या काळातील आहे तर तर बहुदा आपल्याला हे नाटक आवडणार नाही अशीच भावना मनात घेऊन गेलो होतो. पण हि भावना फक्त प्रयोग सुरु होई पर्यंतच राहिली. प्रयोग सुरु झाला आणि ३ तास कसे गेले कळले सुद्धा नाही. चांगली कथा, सगळ्यांचा अप्रतिम अभिनय आणि त्याला संगीताची साथ आणि विनोदांची फोडणी म्हणजे नाटक रंगले नाही तरच नवल. अभिजीत खांडकेकर, इशा केसकर, मृण्मयी गोडबोले, ललित प्रभाकर आणि निखिल रत्नपारखी ह्यांचा रंगमंचावरचा सहज अभिनय लक्षात राहून जातो. हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणल्याबद्दल सुनील बर्वे कलाकृती अर्थात 'सुबक' चे आभार आणि पुढील नाटकांसाठी खूप शुभेच्छा !!! आणि हो ह्या नाटकाचे फक्त २५ च प्रयोग होणार असल्याने .. आपल्या जवळच्या नाट्यगृहात लवकर हे नाटक बघून घ्या .😊😊